श्वासांच्या समिधा___ज्ञानेश्वर कटारे

                               


मी हे जे काही लिहितोय त्याला समीक्षा वा रसग्रहण अजिबात समजू नका . कारण मी त्या दृष्टीनं लिहित नाहीचै . मला किलर दराडेंची गझल मनापासून आवडली . ' श्वासांच्या समिधा ' हा गझलसंग्रह काळजात ऊतरलाय . बास , एवढ्यासाठीच मी हे लिखान वगैरे करतोय . यात मला गझलेबद्दल फार काही कळतं किंवा मी गझलेचं पोस्टमॉर्टम करु शकतो हा मुद्दा कुठंच येत नाही ! एखाद्या सुंदर ललनेच्या प्रेमात पडल्यानंतर तिच्या हरेक नखऱ्याला आपण अदा म्हणू लागतो . तिच्यावर प्रेम केलं की तिच्या चुका वगैरे बघायची आपल्याला गरज नसते . आपण कधी तिला तिचे मार्क्स विचारत नाही . माझं हे लिहिणं तसै . मला किलर दराडेंची गझल भावली . मी तिच्यावर फिदाये . आय लव हर.. बाकी यापेक्षा जास्त काही नाही .

किलर दराडेंची एंट्री अशी धाँसू झालीये :

कधी वीणेतुनी आलो कधी टाळातुनी आलो
तुकोबाची व्यथा घेउन तळागाळातुनी आलो

विठोबा संपली वारी निघू का रे घरी आता
तुला माहीत आहे मी मुलाबाळातुनी आलो 

आपण एकेक पान , एकेक गझल वाचत जातो . आपला आणि आजूबाजूच्या जगाचा संपर्क हळूहळू तुटत जातो . नंतर तो कधी पुर्णपणे तुटला ते आपल्याही ध्यानात येत नाही . सतीश मास्तरांच्या एकसेएक गझला आपल्याला निव्वळ म्याड करतात ! लै भयानक फिलिंग असते ती . गझला म्हटलं की निव्वळच प्रेम , प्रियसी , रुसणं , फुगणं , प्रेमभंग नव्हेच ! मास्तरांच्या गझलेला सामाजिक संवेदनशिलतेची एक हळवी किनारै . गझलकार हा संवेदनशीलच असतो . पण कधी कधी त्याला त्या संवेदना व्यक्त करताना तितका नेमकेपणा येत नाही . पण मास्तरांच्या शेरांमध्ये तो नेमकेपणा , ती अचूकता लैच राईट आढळते . आपल्या पैल्याच गझलेच्या पैल्याच शेरात मास्तर काय म्हणतात बघा :

शेतीप्रधान देशा दे एवढेच उत्तर
केव्हा भिजेल अमुची डाळीत पूर्ण भाकर

यापेक्षा अचूक काही असूच शकत नाही ! शेतीप्रधान देशात खुद्द शेतकऱ्यांचेच किती हाल चालूयेत ! सगळ्या जगाचं पोट भरणारा शेतकरी स्वतः मात्र दोन वेळच्या भाकरीच्या चिंतेतै ! फार विदारक परिस्थिती आहे ! ती अगदी जशास तशी मांडलीये दराडे मास्तरांनी...मास्तरांची गझल प्रेमात तर पाडतेच पण त्याचबरोबर विचारातही पाडते . समाजातील व्यंगांवर अचूक बोट ठेवून मास्तर ते अगदी योग्य पद्धतीनं मांडतात . कुठं भडकपणा वा कुठं अतिरंजितपणा नसतो . अगदी समर्पक शब्दांत ते आपले विचार , आपले खयाल पेश करतात .

गावामध्ये सकाळी मी ऐकली दवंडी
अश्रू पिणे शिका हो पाणी पुरेल कुठवर

सतीश दराडेंना महाराष्ट्रभर ' किलर दराडे ' का म्हणत असावेत , हा प्रश्न मला पडलेला होता . हळूहळू या प्रश्नाचं ऊत्तरही याच गझलसंग्रहात मिळालं . किलर दराडेंचे शेर अगदी साध्या सोप्या समजेबल भाषेत असतात . पण त्या शेरांची , त्या गझलांची भव्यता मात्र आपल्याला अचंबित करते ! भव्य.. दिव्य..अफाट...! त्यांच्या गझलेच्या याच कातील अदांमुळं त्यांना महाराष्ट्राच्या रसिकांनी ' किलर दराडे ' हे नाव बहाल केलंय . त्यांच्या गझलांमधील खयाल लैच अलगद असतात . लै लै लै अलगद...

भोळेपणा तिचा मी सांगू किती तुम्हाला
ती मोजते वितीने ताऱ्यांमधील अंतर 

किती अलगद.. किती निरागस.. किती ईफेक्टिव्ह.. आय लब यू किलर गुर्जी ! मन अगदी फ्रेश होतं . एकेक शेर अगदी काळजात घुसतो पण दर्द अजिबात होत नाही ! आपल्याही नकळत आपण या भोळ्या गझलेच्या प्रेमात पडतो . प्रेम असं नकळतच होत असतं म्हणा.. प्रेम झाल्यावर काय होतं ते बघा :

डोळ्यात साकळावा सारांश काळजाचा
प्रेमात वेळ नसतो बोलायला सविस्तर 

मास्तर लैच मुद्द्याचं बोलतात .

सतीश दराडे किलर कसे ठरतात ते त्यांच्या नजाकतीनं अन् भव्यतेनं भारलेल्या रचनांवरुन समजतं . आपण फक्त वाचायचं अन् प्रेमात पडायचं . आपल्या हातात दुसरा काही ऑप्शनच नसतो . फार फार बोलके शेर असतात मास्तरांचे . गझलेशी आपण संवाद साधू लागतो . ती कधी आपली मैत्रीण होऊन जाते कळत नाही . एक भोळी , भाबडी , अवखळ मैत्रीण ! मास्तरांच्या लिखानात जिवंतपणा आहे . ऊगाचच ओढून ताणून कैच्याकै फाफटपसारा ते मांडत नाहीत . जे काही मांडायचंय ते अगदी थेट आणि लैच समर्पक मांडतात ते . गझलेचा जन्मच मुळात प्रेमातून झालेलाय . परत या गझलेतून प्रेमाचा जन्म होतो . काळजाच्या जमिनीवर मास्तरांची गझल प्रेम पेरत जाते . हे सगळं आपोआप , नकळत , अलगद घडत असतं . मास्तरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर असं म्हणता येईल :

जीव आंब्याची डहाळी होत जातो
काय गाते कोकिळा माहीत नाही

आपण असं आकंठ प्रेमात बुडालोय हे आपल्याही लक्षात येत नाही . मास्तर आपलं मन जिंकतात . प्रत्येक वेळी नवं काहीतरी पेश करतात . नाविन्य हा आणखी एक प्लस पॉइंटै सतीश दराडेंच्या गझलेचा . एकसुरीपणा किंवा तेचतेपण कुठंच जाणवत नाही . सतत काहीतरी वेगळं आणि हवंहवंसं गवसत राहतं . एखाद्या क्लासिक थ्रिलर चित्रपटात जशी प्रेक्षकांची ऊत्कंठा शिगेला पोचते तशी आपली अवस्था श्वासांच्या समिधा वाचताना होते . एकेक शेर आपण डोळ्यात प्राण आणून टिपत जातो . काही मिस होऊ नये , कुठं गल्लत होऊ नये... आपलं चित्त क्षणभरही विचलित होत नाही . आपण एकदम घट्ट जखडून राहतो . ही जखडण हवीहवीशी असते.. प्रेयसीच्या ऊबदार मिठीसारखी !
एक विशेष विषयांतर करतोय . थोडं आवश्यक आहे म्हणून . 

पोट फुटल्यासारखे आभाळ गळते
मारला कोणी विळा माहीत नाही

अशा शेरांशी आपण आपोआप एकरुप होऊन जातो . सतत गळणारं आभाळ इतक्या अप्रतिम रुपकात कुठं पहायला मिळेल का ? अशा काही शेरांवरुन मास्तरांची एक हळवी बाजू समोर येते . त्यांच्या शेरांमध्ये , गझलांमध्ये चकचकीतपणा , पॉलिश असलं काही निव्वळ दुर्मिळ ! त्यांची मातीशी जुळलेली नाळ अजूनही घट्टै . त्यांच्या गझलांमध्ये कित्येक ग्रामीण शब्द आणि संकल्पना येतात . त्यांची ही अदाकारी शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही गटातील रसिकांना भावते.

बघुन खोप्याचे गवत गायी म्हणाल्या
सुगरणींनो हे किती नुकसान आहे

याला म्हणत्यात अस्सल जाणीव ! सुगरणींच्या घरट्यांची तोंडभरुन तारीफ करणारे कवी , गझलकार आहेत . पण त्याच गोष्टीला जर एखाद्या गायीच्या नजरेतून पाहिलं तर ते तिच्या अन्नाचं - गवताचं नुकसान असतं ! अशी जब्राट भावना सुचणंच मुळात कठीण . अन् परत ती ईतक्या सफाईदारपणे मांडणं म्हणजे अफाटच ! दराडे गुर्जींची ग्रेटनेस अशाच अफाट रचनांमधून आपल्याला कळत जाते . साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींकडे ते फार वेगळ्या नजाकतीनं पाहतात . नजाकत हा किलर दराडेंच्या गझलेचा आत्मा आहे .

आज ती स्वप्नात आली वाटते
झोप माझी भाग्यशाली वाटते

का अचानक हृदय माझे थांबले
ती अता जाते म्हणाली वाटते 

क्या ब्बात है ! इथं काळीज आपोआप हलकं होऊन डोलू लागतं . प्रेमात आणि गझलेत नजाकतीशिवाय सगळंच अपुर्ण असतं . गझलेतली नजाकत पहायची , अनुभवायची असेल तर किलर दराडेंच्या गझलांशिवाय पर्याय नाही ! फार काही वेगळं किंवा जगाच्या बाहेरचं ते मांडत नाहीत . ते मांडतात रोजचीच दुःखे पण किलर अंदाजात...

यांची फुले करु , का ठिणग्या करु प्रिये
डोळ्यांत दोन अश्रू जमले तुझ्यामुळे 

याला म्हणतात प्रतिभा ! नाद खुळा ट्यालेंट ! किती कॉमन गोष्टीला कसं वलय प्राप्त झालंय इथं... दराडेंची गझल परीसै . त्यांचे साधे खयालही गझलेत आले की सोन्याचे वाटतात . प्युअर गोल्ड ! आपल्याला फक्त ती लय , तो मुड पकडता यायला पायजे . आपल्याही आयुष्याचं सोनं झाल्यासारखं वाटेल ! सहज सोप्या गोष्टी तितक्याच सहज सोप्या पद्धतीत मांडल्या की त्या ग्रेट होतात . पण हे सहज सोपं मांडणं मात्र बिलकूल सोपं नसतं ! एक सच्चा संवेदनशील गझलकारच या सोप्या गोष्टी सहज करु शकतो ! किलर दराडे हे सगळं अगदी परिणामकारकपणे करतात ...

रानातले गवतही पायास लॉन वाटे
मी वाटतो मला का हल्ली अमीर मित्रा

या गोष्टीमुळंच सतीश मास्तर दिलावर राज़ करतात . ते आपला आपल्या जिवनाकडे बघण्याचा नजरियाच बदलून टाकतात . आपली जूनी दुःखे आता आपल्याला दुःखे वाटत नाहीत . दुःखांना आता गझलेचा सहवास लाभलेला असतो . एखाद्या कुरुप प्राण्याचं जादूनं राजपुत्रात रुपांतर व्हावं तशी आपली दुःखे आपल्याला देखणी भासू लागतात ! ही गझलेची जादू आहे.. ही किलर दराडेंची किमया आहे.. हे सगळं अफाट आहे.. भन्नाट आहे...

संपली देशातली सारी गरीबी
बातमी खोटी तरी भन्नाट आहे

गझल भन्नाटच असते . गझल सुंदरच असते . फक्त ती तितक्याच सुंदर नजरेनं टिपता यायला पायजे . किलर दराडेंचा हा गझलसंग्रह सुंदरतेनं काठोकाठ भरलेलाय . पण तुमची सुंदरतेची व्याख्या काय यावरही बरंचसं अवलंबून आहे . निव्वळच चकचकीतपणाला भुलणारे कदाचित त्या दिखाव्यालाच सुंदरता समजत असतील ! मास्तरांच्या गजलेत दिखावा हा प्रकारच आढळत नाही . जे काही असतं ते थेट काळजातून जशास तसं आलेलं असतं . म्हणूनच ते काळजाला भिडतं .

तिची धून ओठावरी सारखी
कन्हैय्या तुझ्या बासरी सारखी 

किती धास्तावले आहे बियाणे पेरणीपूर्वी
पुन्हा का सांगतो त्याला तुझ्या शेतीतले तोटे 

डोळ्यात थांबला आहे स्मरणांचा मेणा देवा
मज स्वागत करण्यासाठी अश्रू तर दे ना देवा 

एवढे जगण्यास आता खूप आहे
ती जिथे आहे तिथे सुखरुप आहे

आसवांनो जरा बरसणे थांबवा
दुःख पेरायला वापसा पाहिजे 

हा प्रवास खुप सरळ आहे . काळजापासून काळजापर्यंत ! ईतक्या अप्रतिम सादगीनं असे एक से बढकर कर शेर आपल्या काळजाचा ठाव घेत जातात . मी अगोदरच सांगितल्याप्रमाणं सतीश मास्तर प्रेमात पडायला आपल्याला जवळजवळ भाग पाडतात ! नाजूकता अन् तितकीच भावूकता अन् तितकीच गंभीरता अन् तितकीच सुंदरता... प्रेमात न पडणारा अंमळ हापम्याडच असेल ! मी हापम्याड अर्थातच नाहीये . श्वासांच्या समिधा वाचत वाचत मी फुलम्याड झालोय.. झिंगलोय.. अक्षरशः बेधुंद झालोय..

ही कोणती मदीरा तू पाजलीस प्रेमा
काया दशेत आहे आत्मा नशेत आहे

गझल ही प्रेमाची भाषा असते . आपले प्रेमाबद्दलचे ते शहारे आणणारे अनुभव हा गझलेचा हक्काचा विषय आहे ! किंबहुना त्याशिवाय गझल गझल वाटतंच नाही . गझल या शब्दाचा अर्थ प्रियकर आणि प्रेयसीमधील संवाद असा मी कुठंतरी वाचलेलाय . ( अन् मला तो पटलेलायपण . ) आता जेव्हा प्रियकर आपल्या प्रेयसीशी बोलत असेल तेव्हा तो देशाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल थोडीच बोलणारै ? रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत कसा आणि किती घसरतोय असं थोडीच विचारणारै ? त्यांची चर्चा कदाचित अशी असेल :

मी कुठे जन्मभर संगती मागतो
एकदा भेट हे का अती मागतो 

माझ्या तिच्या मिठीचा इतिहास काय सांगू
संकोच आड आला एकांत लाभल्यावर

ती मिठी , तो चंद्रमा , ती पौर्णिमा
काळ यावा मागचे क्षण घेउनी 

तुला जवळ घेता क्षणी मंद होतो
दिव्याला अता जाण आली असावी

नको अंग चोरु कवीतेपरी
जरा भेट कादंबरी सारखी

आपल्या मनातल्या या गोष्टी जेव्हा नेमकेपणानं आपल्या समोर येतात तेव्हा आपण किंचित लाजल्यागत होतो ! इतकं अस्सल लिखाण वाचलं की असं वाटतं कुणीतरी आपल्याच भावनांना शब्दरुप दिलंय.. गोड , नाजूक अन् प्रेमळ शब्दरुप ! या रोमांचित करणाऱ्या शेरांमुळं आपल्या मनाला लैच शाय शाय फिल होतं . जे मनात असतं तेच समोर आलेलं असतं . आपली लैच लाजरी तारांबळ उडते ! रसिकांच्या मनातलं लिहिणारे किलर दराडे अशाप्रकारे रसिकांच्या मनावर गारुड घालतात . पण ते फक्त रोगाबद्दलच बोलत नाहीत तर ते या प्रेमरोगाचा इलाजपण सांगतात . प्रेमभंगाचा कडवा डोस पचवायचा असेल तर सोबत दराडे मास्तरांचं गझलटॉनिक असणं लैच आवश्यक बनतं . प्रेमभंग पचवताना आपल्या स्वाभिमानी वृत्तीचंही ते दर्शन घडवतात .

सोडुनी जातेस पण लक्षात घे
जन्मभर जगशील दडपण घेउनी

हा प्रेमभंग याला नसतो इलाज दुसरा
शिंपून आसवांना जखमा बऱ्या कराव्या 

मला त्या कथेतील केलेस नायक
कथा जी कुठेही प्रकाशीत नाही 

कुणाला माहिती नसतिल तुझे माझे खरे किस्से
तरी अपुल्या घरोब्याचे उद्या होतील बोभाटे

या कलंदराकडे सगळ्याच कला आहेत . सगळेच बाण याच्या भात्यात आहेत . निर्णय आपण घ्यायचा असतो की आपण कुठल्या बाणानं घायाळ व्हायचंय ! सतीश दराडे गझलेला एका वेगळ्या ऊंचीवर नेऊन ठेवतात . समाजातील विदारक वास्तव अत्यंत समर्पक शब्दांत मांडताना त्यांची प्रतिभा सर्वोच्च पातळीवर असते .

नोकरीवाला कुणी मेल्यावरी
एक जागा रिक्त झाली वाटते

हा शेर वाचताच काळजात चर्र होतं ! आपल्या पापभिरु मनानं कितीही नाकारलं तरी हे वास्तव आहे .

दाखवाया शिस्त आटोकाट आहे
कायद्याला आतुनी पळवाट आहे 

ना सोयरे अखेरी ना यार शेवटी
देतात फक्त अश्रू आधार शेवटी 

तुजला सवाल करतो साधाच ब्रम्हचाऱ्या
स्वप्नामध्ये कितीदा चढलास बोहल्यावर

मास्तरांची वास्तव मांडण्याची ही पद्धत अफलातून आहे . मास्तरांची गझल भव्यतेनं भारलेली असते . त्यांच्या प्रतिभेची भव्यता त्यांच्या रचनांमधून बेशक दिसते .

झालो कसा विदेही गझले तुझ्यामुळे
देहाशिवाय जगणे जमले तुझ्यामुळे

भृंग मी हक्क माझा सुगंधावरी
मी फुलांना तरी संमती मागतो

मास्तरांचे अनेक शेर , अनेक गझला अक्षरशः वेडं करुन टाकतात ! प्रेम आणि गझल यांचं कॉकटेल म्हणजे किलर दराडे !
खरंतर आता थांबूच नये असं वाटतंय.. पण आता थांबावं लागेल ! चित्रपटाची खरी जादू चित्रपटगृहातच अनुभवली पाहिजे . ट्रेलर बघून अन् परीक्षणे वाचून चित्रपट कळत नसतोच . 'श्वासांच्या समिधा' हा नितांतसुंदर गझलसंग्रह अशाच पिक्चरसारखाये . त्याची खरी जादू तुम्ही स्वतःच अनुभवली पाहिजे . श्वासांच्या समिधांची द्वितीय आवृत्ती येत्या डिसेंबरमध्ये येतेय... किलर दराडेंची अदाकारी अशीच बहरत राहो , आम्हा रसिकांना असंच पुन्हा पुन्हा प्रेमाच्या पावसात भिजायला मिळो.. आता थांबतो ! दराडे मास्तर , आय लव यू...
___________________________________________________

५ टिप्पण्या:

  1. लयभारी डी . के भाऊ . . . . . अफलातून ……।

    उत्तर द्याहटवा
  2. कटारेजी खूप सुंदर समिक्षा.'श्वासांच्या समिधा ' ह्या उत्कृष्ट गझल संग्रहाची तेवढ्याच तोला मोलाची उत्कृष्ट समिक्षा आपण आपल्या विशेष शैलीत केली आहे.अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय मार्मिक रसग्रहण,
    सतिश आणि समिक्षक ज्ञानेश्वर बंधूचे अभिनंदन

    उत्तर द्याहटवा